पुणे : क्रेडाई महाराष्ट्रातर्फे रात्फे ताफे १३ व १४ जुलै रोजी नाशिक येथील महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसला दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘महारेरा’ अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून, ही सहावी वार्षिक परिषद आहे. यात महाराष्ट्र राज्यातील ५१ शहरातून एक हजाराहून अधिक बांधकाम व्यावसायिक उपस्थित राहाणार आहेत.
‘ही नोंदणी ‘क्रेडाई’तर्फे होणार असून, हा क्रेडाईच्या इतिहासातील उच्चांक ठरणार आहे,’ असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केला.
या परिषदेला वकील, वास्तुविशारद, कायदे सल्लागार,बँकर्स, अभियंते देखील उपस्थित राहू शकतील. ही परिषद सशुल्क असून सर्वांसाठी खुली असणार आहे. क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, प्रेसिडेंट (इलेक्ट) सतीश मगर, अध्यक्ष जक्षय शहा, उपाध्यक्ष बोमन इराणी, माजी चेअरमन इरफान रझाक, जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख एस. चोकलिंगम या वेळी उपस्थित राहातील.
‘महारेरानंतरच्या एक वर्षाच्या कालावधीत बांधकाम व्यावसायिकांवर झालेला सकारात्मक बदल-परिणाम’ यावर गौतम चटर्जी व सतीश मगर मार्गदर्शन करतील. गीतांबर आनंद, इरफान रझाक हे ‘रियल इस्टेट ब्रँडिंग’ या विषयावर बोलणार आहेत. भूमी अभिलेखचे संचालक एस.चोकलिंगम हे ‘जमिनीचे मालकी हक्क’ आणि यामध्ये सरकार काय पाऊले उचलत आहे याबद्दल माहिती देणार आहेत.
सध्या भूखंड पाडून मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंगचा व्यवसाय चालू असून, त्यातील भविष्यातील वेध घेण्याचा प्रयत्न शांतीलाल कटारिया करणार आहेत. परवडणारी घरे, म्हाडाअंतर्गत पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपचे व्यवस्थापन आणि नियोजनतंत्र वापरून बांधकामाचा दर्जा कसा सुधारला जाईल याविषयी अंकुर पंधे, दिलीप मुगलीकर, कर्नल अजय कुमार सिंग हे विवेचन करतील.
बोमन इराणी बांधकाम व्यवसायातील यशस्वी आणि नामवंत कंपन्यांचे चढ-उतारांचे आलेख व त्यांची कारणमीमांसा याबद्दल आपले मत मांडणार आहेत. या व्यतिरिक्त दिग्गज व्यावसायिकांची मुलाखतीतून त्यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.